TOD Marathi

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष फुटले आहेत. शिवसेना मागच्या वर्षी आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही दिवसांपूर्वी. त्यानंतर आता काँग्रेस पक्षही फुटणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसमधले लोकही यायला इच्छुक आहेत असं म्हटलं होतं. तसंच आमदार बच्चू कडू यांनीही हेच वक्तव्य केलं. या सगळ्या चर्चा सध्या होत असताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.

“मला असं मुळीच वाटत नाही की काँग्रेस पक्ष फुटेल. काँग्रेस पक्ष हा विचारांनी पक्का आहे. एकदा काँग्रेस पक्ष फुटला ही वस्तुस्थिती आहे. पण यापुढे असं होईल असं वाटत नाही.” असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा” …“मला तडजोड करावी लागली, तर मी…” राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य”

महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती आत्ता आली आहे ती पाहत बसण्यापेक्षा जास्त आत्ता तरी काही करु शकत नाही. राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रथा सुरु झाली आहे. आता पुढे बघायचं काय काय घडतं आहे? इतकंच नाही तर निवडणुका जवळ येत आहेत. जनतेला जे काही झालं आहे ते आवडलेलं नाही. त्यामुळे जनताच निवडणुकांच्या वेळी त्यांना धडा शिकवेल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

जे काही घडलं आहे त्यावर आता काय बोलणार? पुढे काय काय घडतंय बघावं लागेल. कशा तऱ्हेने सरकार चालवलं जातं ते बघू. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं त्यानंतर मी शरद पवारांना भेटलो नाही असंही शिंदे यांनी सांगितलं आहे.